अकाऊंट क्लोज्ड, वेळीच घेतलेला निर्णय समाधान शांती देतो!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/8/2026 :
संध्याकाळचे सहा वाजले होते. बाल्कनीत बसून हातातला चहाचा कप पेलताना जनार्दनरावांचे डोळे उगाचच शून्यात दाटले होते. नेहमीप्रमाणे मनात विचारांचे वादळ सुरू होते—गेल्या महिन्यात मुलगा-सुनेने स्वतंत्र राहण्याचा घेतलेला निर्णय, काल रस्त्यात भेटूनही न बोलता निघून गेलेला जुना मित्र, आणि दोन वर्षांपूर्वी ज्या नातेवाइकाला अडीअडचणीत मोठी आर्थिक मदत केली त्यानेच नंतर फिरवलेली पाठ!
*मी आयुष्यभर लोकांसााठी काय काय नाही केलं? पण बदल्यात मला काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि अपमान...* जनार्दनराव स्वतःशीच पुटपुटले. त्यांच्या छातीत एक ओळखीची जाळणारी व्यथा जागी झाली.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात जनार्दनरावांचे जुने स्नेही आणि अभ्यासू लेखक 'वपु' उभे होते.
"काय जनार्दन, कसला विचार चालू आहे? चेहरा एवढा पडलेला का?" वपुंनी आत येत विचारले.
जनार्दनरावांनी उसासा टाकला, "काय सांगू वपु, लोकांच्या वागण्या-बोलण्याचा फार त्रास होतो आजकाल.
*ज्यांच्यासाठी आयुष्य घासले तीच माणसे अशी विचित्र वागतात. अपमान करतात, दुर्लक्ष करतात.*
*उपकारांचे विस्मरण झाले आहे सगळ्यांना."*
वपु थोडे हसले. त्यांनी खिशातून एक छोटी वही काढली आणि समोरच्या टेबलावर ठेवत म्हणाले, "जनार्दन, एक सांगू? *आपण या जन्मात येतो ते कोणाच्या अपेक्षा पूर्ण करायला नाही, तर आधीच्या कुठल्यातरी जन्माची परतफेड करायला! आपण प्रत्येकाचे मनात एक 'खाते' उघडून बसलोय. आणि समोरच्याने आपल्या इच्छेनुसार वागावे, अशी अपेक्षा ठेवतो."*
"पण वपु, त्रास तर होतोच ना?" जनार्दनराव काकुळतीला येऊन म्हणाले.
"त्रास तेव्हाच होतो, जेव्हा आपण ते खाते अजून चालू आहे असे मानतो," वपु शांतपणे समजावून सांगू लागले, "तुम्ही दृष्टिकोन बदला.
मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत? समजा, एखादी जुनी परतफेड होती, ती या जन्मात पूर्ण झाली. तुमच्या उपकारांची कोणाला आठवण राहिली नाही? समजा, ते खाते आता पूर्ण झाले. बँकेत शिल्लक संपली की पासबुकावर कसा *'अकाऊंट क्लोज्ड'* चा शिक्का मारतात? बस, तसेच मनातल्या या *माणसांच्या नावावर 'अकाऊंट क्लोज्ड'चा शिक्का मारा आणि त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका!"*
जनार्दनराव थबकले. वपुंचे शब्द थेट त्यांच्या मनाचा ठाव घेत होते.
वपु पुढे म्हणाले, "आपले मन जेवढे बलदंड असते ना जनार्दन, तेवढेच ते लवचिकही असते. आजवर तुम्ही मनाच्या हुकुमात राहिलात, त्याच्या भावनांची गुलामी केलीत. आता त्या मनाला सांगा—'बाबा रे, आजपासून मी तुला मुक्त करत आहे.' परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय सुटका नाही. मग कशाला विचारता परमेश्वराला की मला का जगवलंस? जे घडतंय, ती केवळ परतफेड आहे हे स्वीकारा."
जनार्दनरावांनी डोळे मिटले. मनातल्या गच्च साचलेल्या आठवणीं कडे ते एका वेगळ्या नजरेने पाहू लागले.
मुलगा दूर गेला
*अकाऊंट क्लोज्ड*
मित्राने दुर्लक्ष केले *अकाऊंट क्लोज्*
नातेवाइकाने फसवले
*अकाऊंट क्लोज्ड*
आश्चर्य म्हणजे, एकेक खाते बंद झाल्याची भावना मनात येताच, छातीत वर्षानुवर्षे साचलेला तो जाळणारा भार हळूहळू हलका होऊ लागला.
वपु उठले, त्यांनी जनार्दनरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे म्हणाले, "हा प्रयोग करून बघा जनार्दन, आणि किती खाती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या. अगदी उद्या मीसुद्धा तुम्हाला रस्त्यात भेटलो आणि ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्ट्री होती, असं समजा आणि माझी फाइलही बंद करा!"
वपु निघून गेले. जनार्दनराव पुन्हा बाल्कनीत येऊन उभे राहिले. आता संध्याकाळचा वारा त्यांना शांतवत होता. मनात दुःखाची किंवा रागाची कोणतीही शिल्लक नव्हती.
*अनेक वर्षांनंतर आज जनार्दनरावांनी एक दीर्घ, मोकळा श्वास घेतला. कारण, त्यांच्या मनातील नकारात्मकतेची सर्व पासबुके आज खरोखरच जळून खाक झाली होती!*
संजय मानके.
0 टिप्पण्या