⭕ सुभाष चंद्रांचे 22 हजार
कोटींचे कर्ज केले माफ ;
‘झी’च्या मालकावर कृपादृष्टी
🟢 वित्तीय संस्थांचे झाले ‘मुंडन’
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/8/2026 :
माजी राज्यसभा सदस्य आणि झी व एस्सेल समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा यांचे तब्बल 22 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यांच्यावर एकूण 22006 कोटी रुपयांचे कर्ज आहे वा होते. पण त्यांना फक्त साडेसहा कोटी रुपये भरावे लागणार असून, उरलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) घेतला आहे. एखाद्या उद्योगपतीचे इतके कर्ज माफ करण्याची ही पहिलीच घटना आहे.
दिवाळखोरी कायद्याच्या (इनसॉल्व्हन्सी अँड बॅंकरप्सी ॲक्ट) खाली हे कर्ज माफ केले गेले आहे. सुभाष चंद्रा हरियाणातून 2026 साली भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेवर गेले होते. झी ग्रुपची सुमारे 80 टीव्ही चॅनेल्स आहेत. त्यांनी 22006 कोटी रुपयांचे कर्ज फेडणे शक्य नाही, असा दावा एनसीएलटीकडे केला होता. मात्र वित्तीय संस्थांनी त्यास आक्षेप घेतला आणि सुभाष चंद्रा यांच्या मालमत्ता, आर्थिक स्थिती यांची बारकाईने तपासणी करण्याची मागणी केली.
ती एनसीएलटीने मान्य केली नाही.
एचडीएफसी, ॲक्सीस, यूनियन, कॅनरा बँक, आरबीएल बँक, एलआयसी हौसिंग यांनी हे कर्ज सुभाष चंद्रा यांना दिले होते. त्यातील फक्त 0.03 टक्के कर्जाचीच फेड सुभाष चंद्रा यांना करावी लागेल. एवढे मोठे कर्ज माफ करण्याच्या पद्धतीला इंग्रजीत ‘हेअर कट’ ही संज्ञा आहे. पण इथे तर वित्तीय संस्थांचे पार मुंडनच झाले आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची वेळ आली की उच्च व मध्यमवर्गीय लोक शेतकऱ्यांवर टीका करतात. यांना कर्जमाफी देणे चुकीचे आहे, अशी टीका करतात. शेतकऱ्यांचे लाड केले जातात, अशी तक्रार ऐकू येते. इथे मात्र एका फटक्यात 22 हजार कोटी माफ झाले आहेत. खासगी असो वा सरकारी, या बँकांत पैसा असतो तो तुमचा-आमचा. त्यामुळे कर्ज माफ करताना सुभाष चंद्रा यांची मालमत्ता ताब्यात घेण्याचा व प्रसंगी त्या विकण्याचा निर्णय घ्यायला हवा होता.

0 टिप्पण्या