१ जून पहिल्या एसटी बस ची सुरुवात

१ जून पहिल्या एसटी बस ची सुरुवात

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/06/2026 :

पहिली एसटी बस १ जून १९४८ रोजी पुणे-नगर मार्गावर धावली. BSRTC ची (बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन) पहिली बस यादिवशी पुणे ते अहिल्यानगर (अहमदनगर) या मार्गावर धावली. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती. त्यावेळी देखील अवैध वाहतूक होती. त्यांच्याकडून एसटीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्तात माळीवाडा ते पुणे अशी बस नेता आली, अशी माहिती एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांनी दिली. हीच त्या काळातील राज्य परिवहन म्हणजे आजच्या एसटीची सुरुवात होती. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचने नंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही BSRTC मध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.

एसटीचे पहिले चालक लक्ष्मण केवटे म्हणाले, जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. या मार्गाचे प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोक प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. शिवाजीनगरला कार्पोरेशन जवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती, पण राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल, या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बस माळीवाडा वेशीपासून ते पुणे पर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली. त्यावेळी किसन राऊत हे बसचे चालक होते. पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकात उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले.

लाल डबा हे लोकांचं तसं आवडीचं नाव. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर कुठेही जायचं असेल तर मुंबईत प्रायव्हेट बसगाड्यांची काही कमतरता नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने ‘गड्या, अपुला लाल डबाच बरा’ असं म्हणत मुंबईकर एसटीलाच प्राधान्य देतो. अशा या महामंडळाचे मुंबईत मोठी तीन आगारं आहेत. एक म्हणजे मुंबई सेंट्रल, दुसरा परेल आणि तिसरा कुर्ला आगार. कुर्ला आगार बाकीच्या दोन आगारांच्या तुलनेत मोठा असला तरीही ज्या ठिकाणी डेपो असलेलं मोठं आगार म्हणजे मुंबई सेंट्रलचं आगार होय. असा हा मुंबई सेंट्रलचा डेपो सगळ्यात जुना आणि पहिल्या क्रमांकाचा डेपो म्हणूनच ओळखला जातो. पश्चिम रेल्वे स्थानकाच्या समोरच असलेला राज्य परिवहन मंडळाचा हा मुंबई सेंट्रलचा डेपो म्हणजे मुख्यालय आहे. या डेपोची स्थापना १९५० साली झाली. मुंबई सेंट्रलचा भाग हा मध्यवर्ती असल्याने तिथेच मोठी जागा घेतली आणि या सगळ्या बसेस एकाच छताखाली आल्या. हळूहळू बसेसची संख्या वाढू लागली आणि इथला लोड वाढला. त्यामुळे नंतर परेल (६०च्या दरम्यान) आणि कुर्ला डेपोची निर्मिती झाली.

साडेपंधरा हजार बसेसचा ताफा, दररोज १७ हजार मार्गांवर ७० हजार प्रवाशांना सेवा, अगदी खेड्यापाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुमारे एक हजार थांबे, २४७ आगारे आणि वर्षाकाठी फायदा झालाच तर जेमतेम पाच कोटी रूपयांचा महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन मंहामंडळाची म्हणजेच सर्वसाधारण भाषेतील ‘एसटी‘ ची ही बोलकी आकडेवारी आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के जनता अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर म्हणजेच एसटीवर अवलंबून आहेत. व्यवहारात लोक जिला 'लाल डबा’ असे संबोधतात ती एसटी ची बस राज्याच्या अगदी दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांपासून ते थेट नगरे महानगरां पर्यंत पोहोचते. एसटीचे हे भक्कम आणि विस्तीर्ण जाळेच लाल डब्याच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. शासकीय म्हणून भरवशाची सेवा, माफक दर आणि विनम्र कर्मचारी ही सुद्धा एसटीची वैशिष्टे म्हटली पाहिजेत. एसटीच्या स्थापनेच्या दिवसापासून आजतागायत एसटीच्या ज्या समस्या आहेत त्या कायम आहेत. 'एसटी'ला ना स्वायतता, ना ही कुठल्या प्रकारच्या सवलती, उलट एसटी विविध सवलती प्रवासांना देते. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यात सवलत देते. स्पर्धेत बाजी मारण्यासाठी संपूर्ण राज्यभर असलेले विस्तीर्ण जाळे ही एसटीची महत्त्वपूर्ण जमेची बाब आहे. 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी' हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले. सर्व खासगी प्रवासी कंपन्यांनी एकत्र येऊन ठरवले तरी त्यांना एवढ्या खेड्यापाड्यांपर्यंत बससेवा सुरू करता येणार नाही.

एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशात तर एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे म्हणजे फॅशन झाल्यासारखे वाटते. एसटीवर टीका करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जे मार्ग फायद्याचे नाहीत त्या मार्गावरही नुकसान सोसून एसटीची गाडी धावते. ज्या खासगी वाहतूकदारांची तरफदारी लोक करीत आहेत, ते खासगी वाहतूकवाले मग ते ‘नीता असेल, गीता असेल, कोंडुस्कर असतील’ हे खासगी वाहतूकदार जेवढे फायद्याचे मार्ग, त्या फायद्याच्या मार्गावरच त्यांच्या गाड्या चालवतात. या खासगी वाहतूकदारांना एसटी सारखी स्टँण्डसाठी गुंतवणूक करावी लागत नाही. त्यांचे थांबे नाहीत. आपल्या बापाच्या मालकीचा रस्ता आहे, असे समजून या खासगी गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात, तिथेच प्रवासी भरतात. एसटी मध्ये एक लाख कामगार आहेत. १० मध्यवर्ती गॅरेज आहेत. तिथल्या कामगारांना नेहमी पगार आहे, युनिफॉर्म आहे, कामगार क्षेत्रातला बोनस आहे, हक्काच्या रजा आहेत. एसटी मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना मोफत प्रवास आहे, विद्यार्थ्यांना सवलती आहेत. सामाजिक बांधिलकीची सर्वात मोठी जाण महाराष्ट्रातल्या एसटीनेच ठेवलेली आहे. यापैकी कसलीही जबाबदारी खासगी वाहतूकदार घेत नाहीत. त्यांच्या तिकिटांचे दर त्यांना हवे तेव्हा वाढवतात. त्यावर कोणताही निर्बंध नाही, परिवहन खात्याला ते जुमानत नाहीत.

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचे प्रवासाचे सर्वात त्यामानाने स्वस्त आणि सोयीचे वाहतुकीचे साधन म्हणून खेड्या-पाड्यात एसटी हेच सगळ्यात मोठे साधन आहे. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवली जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता. केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. या एसटीच्या डेपोचं वैशिष्टय़ म्हणजे जो कधीही झोपलेला किंवा शांत आढळणार नाही. सतत वर्दळ असते. म्हणजे या ठिकाणी २४ तास एसटी बसेसची ये-जा सुरू असते. कधी रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी गावी जाण्यासाठी डेपोला गेलात तर जवळपास दोनशे गाडया या डेपो मध्ये विश्रांती घेत उभ्या दिसतील. हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आगारे म्हणजे चोवीस तास चाकरमान्यांची अविरत सेवा सुरू असते. कधीतरी एसटीची ही दिवस अन रात्रीची धावपळ पाहायला एखादा तरी या आगारात फेरफटका मारायला हवा.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या