🔥 वस्तूस्थिती 🔥 एक कटूसत्य 🔥

🔥 वस्तूस्थिती 🔥 एक कटूसत्य 🔥 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 05/05/2026 : जोपर्यंत घराघरात पुरुषी कारभार होता तोपर्यंत आदर होता, भावना होत्या. मर्यादा होत्या. यामुळेच  संस्कृती टिकून होती. अर्थात यात महिलांचा सहभाग होताच. 1991 च्या ग्लोबलायझेशन पासून काॅम्प्युटरायझेशन, आयटी  क्षेत्रावर ताबा मिळवण्यात महिला यशस्वी झाल्या. त्यातही काही गैर नव्हते. परंतू मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या नादात त्या मुलींना स्वैर सोडले त्यांच्या आईने, हे वास्तव आहे. आपली मुलगी पैसे कमावते, या गर्वात महिलांना आपली मुलगी स्वैराचार करते याचा अभिमान वाटायला लागला. आपली मुलगी सकाळी उशिरा पर्यंत झोपून रहाते, बाहेरच खाणं ऑर्डर करते, मित्रांबरोबर फिरायला जाते, रात्री उशिरा घरी येते,मुलां सारखी वागते, सॅटर्डे संडे कुठे असते माहीत नाही. विकेंड कसा साजरा करते बापाने विचारले तर मुलीपेक्षा तीच्या आईलाच जास्त राग येतो. "मला मेलीला,आयुष्यभर घरात कोंडून ठेवलेत पण मी मुलीच्या बाबतीत हे ऐकणार नाही." असेच पुरुषांना ऐकून घ्यावे लागेल. कुलधर्म कुलाचार  याचे किती जणींना भान आहे ? वडीलधाऱ्यांचा आदर करावा, रामप्रहरी व तिन्हीसांजा देवासमोर दिवा लावलाच पाहिजे, आपल्या घरातून कोणीही रिकाम्या पोटी जाऊ नये. आपल्या घरी कोणीही अपमानित होऊ नये. घरात पूर्ण कपड्यातचं फिरावे, हे सर्व आईने करावयाचे संस्कार आहेत. पण मुली घरात शाॅर्टवर फिरतात याची बापाला लाज वाटते तर आईला अभिमान वाटतो. आपल्या सर्व अत्रृप्त इच्छा महिला आपल्या मुलींच्या रुपाने पूर्ण करुन घेत आहेत.

       लग्नाच्या मिरवणुकीत महिला व मुली रस्त्यावर नाचतात, त्यांचे घामाने भिजलेले अंग अनोळखी लोक न्याहाळतात तेव्हा घरच्या कर्त्या पुरुषाची मान शरमेने किती खाली जाते याचा विचार किती महिला करत असतील ? काही बोलावे तर, "आम्ही नाचू नयेच का, आम्ही आनंद व्यक्त करुच नये का ? हे ऐकुन घ्यावे लागेल.

     मुलींच्या लग्नाचे बहुतेक निर्णय मुलगी व आई दोघीच घेणार, वडीलांनी मध्ये बोलणे गुन्हा होत चाललाय. मुलगी आणि तीची आई यांच्यात एक मैत्रीच नात होत चालल आहे ही चांगली बाब असली तरी, मुलीच्या फाॅरवर्ड विचाराला आई कडून चालना मिळते म्हणून ही मैत्री आहे, एखाद्या आईने चालीरीती शिकवायचा प्रयत्न केला तर लगेच त्या आईला तू जुन्या ,मागासलेल्या विचारांची म्हणून हिणवायचे. स्वतःच्या पायावर उभे असलेल्या मुलींची माहेरी, सासरी मनमानी न विचारलेली बरी. फक्त पॅकेज पाहून मुलगा पसंती, लग्न म्हणजे फक्त धिंगाणा, सासरी गेल्यानंतर जुने मित्र रहाणारच. नविन नवर्याला वेळ देण्याऐवजी मैत्री चा उदोउदो, सासरची मंडळी एकदम बेकिंमत. मुलाच्या आईवडिलांची स्वतःच्या घरातच निर्वासित अवस्था. एवढे करुनही किती दिवस संसार टिकणार हे कुणी सांगु शकत नाही. कारण एकतर मुलींची सहनशीलता कमी होत चालली त्यात आईची फुस आणि स्वतःच्या पायावर उभे असल्याचा माज. शहरी मुलींची वागणूक पाहिल्यावर कोणत्याही वडीलांना आपल्या मुलीची लाज वाटेल. कोणतीही तमा न बाळगता घटस्फोट होत आहेत वर मुलगा नामर्द होता असे बिनधास्त सांगितले जाते. याला मुलींच्या आईची पाठराखण असते.

 तालुका किंवा खेड्यातील बायांचा वेगळाच खाक्या, बारावी नापास मुलीलाही पुण्यातला इंजीनियरच हवा. त्यांच्या आईंना इंजीनियरच काम काय असतं ते माहिती नाही, इंजीनियर शब्दाच स्पेलिंग येत नाही. तरीही जावई इंजीनियर पाहिजे तोही दहा लाखा वरील पॅकेजचा. काहींना वाटेल, मग खेड्यातील मुलींना इंजीनियर मिळूच नये का ? तर मिळावा नं पण त्या मुलाच्या अपेक्षांना तुम्ही उतराना...

 मुलींच्या आईच्या अपेक्षा पाहून त्या माऊलीला विचारावस वाटत,... बाईग तुझ्या बापान वयाच्या कितव्या वर्षी घर बांधले ? तुझ्या नवर्यान आजवर किती रुपये कमावले ?, तू वयाच्या कितव्या वर्षी लाख रुपये पाहिलेस ? स्वत: एसटी मध्ये अर्ध्या तिकिटा साठी कंडक्टरला भांडतेस, तुझ्या नवर्याने रेशनच्या साखरे साठी खोटे आधारकार्ड बनवून घेतले. आणि तूला जावयाचा थ्री बीएचके हवा, दारात लग्ना आधीच फोर व्हिलर हवी, स्वतःच आयुष्य, "साधा भात-फोडणीच वरण..., फोडणीचा भात- साध वरण" खाण्यात गेलं,परवाच्या भाकरीत कालच्या पोळ्यांना एकत्र करुन फोडणीचे तुकडे तू खाल्लेस , हे तूझ्या लेकीला सांगून बाहेरच खाण ऑर्डर करणे थांबवायला सांग. बाईग मुलींच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतेस, तर तुझ्या मुलाच्या संसारात त्याच्या सासरवाडीची ढवळाढवळ तूला चालेल का ?

       सर्वच महिला अशा आहेत असे अजिबात नाही. अनेक महिलांनी अत्यंत प्रतिकुल स्थितीतही स्वतःच्या हिमतीवर घर तोलून धरलेली उदाहरणे आहेत तर काही पुरुष अपेक्षांचा डोंगर वाढवतात. बायकोच्या पदरा आडून आपला स्वार्थ साध्य करतात.संसार सुरु करण्यासाठी त्या मुलाची काय दमछाक होत असेल, तोही माणूस आहे. घाण्याच्या बैला पेक्षा जास्त त्याला संसारा भोवती फिरावे लागणार याचा विचार कुणी करीत असेल का ? महिलांनो आणि मुलींनो आपल्या अपेक्षांना आवर घाला. मध्यमवर्गीय संसार थाटण्यात काही कमीपणा नाही. घरातील एकच भाकरी अर्धीअर्धी खाल्लात तर नवरा बायको चे प्रेम नक्कीच वाढेल. जेमतेम बचत करुन एखादी वस्तू खरेदी करुन पहा, तुमच्या आनंदाला पारावार रहाणार नाही. संस्कृती जपा, कुलधर्म कुलाचार, सणवार साजरे करा.मोठ्यांचे मानसन्मान ठेवा, घराचे घरपण सांभाळा. बचत करा, हौसमौज घरच्यां बरोबर करा, आयुष्य फार सुंदर आहे. फक्त पैसा / पॅकेज म्हणजेच सर्वकाही, हे मनातून काढून टाका. शेवटी लग्न ही एक व्यवस्था आहे आणि संसार म्हणजे तडजोड आहे हे विसरुन चालणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या