संयुक्त महाराष्ट्र : लढले कोण? मेले कोण? ६०/७०वर्षांत गब्बर झाले कोण?

 

संयुक्त महाराष्ट्र  : लढले कोण? 

मेले कोण? ६०/७०वर्षांत गब्बर झाले कोण?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/05/2026 :

१ मे २०२६...

संयुक्त महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापनदिन.

शेतकरी आणि कामगार यांच्या महान त्यागातून, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले हे राज्य आज नेमके कोणाच्या हातात आहे? राज्यासाठी  लढले कोण? 

मेले कोण? ७० वर्षांत गब्बर 

झाले कोण?

बघता बघता १ मे रोजी महाराष्ट्र  राज्याचा ७० वा वर्धापन दिन आला. एका महान लढ्याची अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रात  झाली. एका भाषिक राज्यासाठी एका राज्याने सलग पाच वर्ष लढा दिल्याची इतिहासात त्यामुळे नोंद झाली. १९५५ ते १९६० असा हा जनतेचा सर्वार्थाने प्रचंड लढा होता. या लढ्यात शेतकरी होते, कामगार होते आणि त्या चळवळीच्या रेट्याच्या बरोबर महाराष्ट्रातील  सर्व राजकीय पक्षांना यावेच लागले. त्या रेट्यातूनच कॉंग्रेस पक्ष वगळून बाकी सर्व राजकीय पक्षांची ‘संयुक्त महाराष्ट्र  समिती’ स्थापन झाली. या समितीत कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, प्रजासमाजवादी होते, लालनिशाणवाले होते, रिपाई होते, रामराज्य परिषद होती, ज्या पक्षांची आज नावेही माहित नाही असे सर्व राजकीय पक्ष चळवळीत होते. पण ख-या अर्थाने चळवळ लोकांची होती, शेतकऱ्यांची  होती, कामगारांची होती. मुंबईच्या गिरणी कामगारांनी तर, इतका जबरदस्त लढा दिला. जे १०५ हुतात्मे गोळीबारात मारले गेले त्यात बिगर मराठी लोकंही आहेत, ते गिरणी कामगार होते. मोरारजी देसाईं च्या आदेशाने झालेल्या गोळीबारात या १०५ जणांचे बलिदान झाले. त्यांच्या महान त्यागातून संयुक्त महाराष्ट्र  राज्य झाले. या लढ्यात १०६ जणांचे बळी गेले पण  १०६ वा हुतात्मा गोळीबारात मारला गेला नाही. त्यावेळच्या पोलिसांनी अनंत गोलतकर याला चौपाटीवर लाथाबुक्यांनी मारले त्यात त्याचा अंत झाला. पोलिसांनी त्याच्या खिशात प्रेमपत्र टाकले आणि आत्महत्या आहे असे भासवले. शेवटी दैनिक मराठाने हे प्रकरण जनतेसमोर मांडून अनंत गोलतकर हुतात्मा आहे हे सिध्द झाले. १०५ जणांचे बंदुकीच्या गोळीने बळी घेतले. १०६ वा बळी पोलिसांनी लाथाबुक्यांनी घेतला. या लढ्यात ६८ हजार लोक तुरुंगात गेले. एकाच दिवशी झालेल्या सत्याग्रहात महाराष्ट्रातल्या कोणत्याही तुरुंगात सत्याग्रही ठेवायला जागा नव्हती. पुण्याचे राम तेलंग यांना २ वर्षंच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. आचार्य अत्रे यांना ६ महिन्यांची सक्त मजुरी झाली. आचार्य अत्रे, कॉमे्रड डांगे, एस.एम.जोशी, सेनापती बापट आणि उध्दवराव पाटील हे पाच पांडव या लढ्याचे नेते होेते. समितीचे अध्यक्ष एस.एम.जोशी होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. या गगनभेदी घोषणांनी मुंबई, पुणे महापालिका ठाणे नगरपालिका या निवडणुकीत कॉंग्रेसचा दणदणीत पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुकीतही केवळ गुजरातच्या जोरावर यशवंतरावांना जेमतेम ९ जणांचे बहुमत मिळाले. पश्चिम महाराष्ट्रात  कॉंग्रेसचे फक्त ५ उमेदवार विजयी झाले. जनतेचा असंतोष किती असु शकतो, जनता किती संतापते हे या लढ्याने दाखवून दिले. देशाचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान पंडीत नेहरूंची सभा चौपाटीवर जाहीर झाली. समितीने आदेश दिला की, ‘नेहरूंच्या सभेवर बहिष्कारा टाका’... मराठाने हेडींग दिले ‘जनता कर्फ्यु..’ ज्या पंडीतजींच्या सभेला आख्खी मुंबई लोटत होती ती नेहरूंची सभा साध्या वेशातील ५० पोलिसांच्या साक्षीने पार पाडली. त्यासभेत स.का.पाटील म्हणाले की, सुर्य चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रला मिळणार नाही. तेव्हा आचार्य अत्रें यांनी दुसऱ्या  दिवशी मराठात लिहीले ‘सदोबा, सुर्य चंद्र तुझ्या बापाचे नोकर आहेत का..’

तिकडे महाराष्ट्रात  उध्दवराव पाटील सगळे राज्य पिंजुन काढत होते. शाहीर अमरशेख माईक नसताना लाखाच्या सभेला आवाज पोहोचेल अशा पहाडी आवाजाने गात होते. त्यांच्यासोबत शाहीर आत्माराम पाटील, शाहीर गवाणकर, शाहीर गजानन बेणी असे जबरदस्त शाहीर होते. रक्त ओकेपर्यंत अमरशेख गात होते, त्या काळातील त्यांची गीते महाराष्ट्र  पेटवून टाकत होती. असा हा प्रचंड लढा शेवटी कॉंँग्रेस श्रेष्ठींना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र  द्यायला भाग पाडून गेला.... मराठी राज्य आले, तुता-या वाजल्या, शिंगे फुंकली गेली, गुलाल उधळलले, गुढ्या उभारल्या गेल्या. महाराष्ट्रात त्या दिवशीचा आनंदोत्सव स्वातंत्र्यदिना एवढाच उत्साही होता. 

 असे मराठी राज्य आले.आता ७० वर्षे झाली.  या ७० वर्षांचा हिशोब करायचा म्हटला तर, ज्या शेतकऱ्यांना  आणि कामगारांनी हे राज्य मिळवून दिले. तेच शेतकरी आणि तेच कामगार आज साठ वर्षांनंतर या महाराष्ट्रात सर्वांत जास्त अडचणीत आहेत. मराठी राज्य झाल्यावर महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांला मंत्रालयात येऊ आत्महत्या करावी लागते. यासाठीच महाराष्ट्र राज्य झालं होत का ? मुंबईचा जो गिरणी कामगार या प्रचंड लढ्यात खांद्यावर झेंडा घेऊन लढत होता. तो सर्व कामगार आता उद्ध्वस्त झालेला आहे त्याला कोणी वाली राहीलेला नाही. जे कामगार आणि शेतकरी लढले त्यांच्याासाठी हुतात्मा चौकात स्मारक उभे राहीले. आणि हेच शेतकरी आणि कामगार महाराष्ट्रात  सर्वांत नाडले गेले आहेत. 

७० वर्षांचे फलित काय? मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी माणसांच्या हातात उद्योग आणि व्यापार राहीलेला, गरवारे, किर्लोस्कर, चौगुले हे मराठी उद्योजक आडचणीत आलेले आहेत. अंबानी-अदानी यांच महाराष्ट्रावर आणि देशावर राज्य आहे. उद्योगधंद्यातून मराठी माणूस बाहेर फेकला आहे. एकेकाळची ‘उत्तम शेती’ आज आत्महत्या करावी  लागतेय. मराठा माणसाच्या हातात सगळ्यात मोठा उद्योग म्हणजे वडापाव.. मराठी माणसाला ८० टक्के नोकऱ्या या मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही मोर्चे काढले. पण, उद्योग, व्यापार, उदीम मराठी माणसाच्या हातात राहीला पाहिजे. मध्यमुंबईतला मध्यमवर्ग मराठी माणूनस उपनगरात फेकला गेला.ज्याला गिरणगाव म्हणत होते तो भाग आता टॉवरगाव झाला आणि हे टॉवर ओसवाल इंडीयाबुलच्या मालकीचे झाले. तिथे वॉचमन आहेत मराठी तरूण आणि मालक आहेत बिगर मराठी. वसंतदादा म्हणत ‘महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र  नाही’ , स.का.पाटील म्हणतं मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे. आचार्य अत्रे त्यावर एवढे भडकले होते त्यांनी जाहीरपणे लिहीले की, सदोबाचा बाप कॉस्मोपॉलिटीन.. पण आज सदोबा खरे ठरले. मुंबई महापालिकेत बिगर मराठी नगरसेवकांची संख्या ५० टक्क्यापेक्षा जास्त झाली.  याचाच अर्थ मुंबई मराठी माणसांची राहीलेले नाही. गेल्या ७० वर्षांतला हा सगळा जमाखर्च मराठी नेत्यांना, मराठी विचारवंताना, मराठी नेतृत्वाला अतंर्मुख करू शकलेला नाही आणि म्हणून १०६ जणांच्या बलिदानातून निर्माण झालेला मुंबईसह अखंड संयुक्त महाराष्ट्र  आज नेमका कोणाचा? जे लढले त्यांचा की ज्यांनी लढ्याला अपशकुन केल्या त्यांच्या मालकीचा. म्हणून आजच्या दिवशी प्रश्न मनात येतो की, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले कोण? मेले कोण? ७० वर्षांत गब्बर झाले कोण?. 

 १मे महाराष्ट्र दिना निमित्ते हा लेख...जय महाराष्ट्र!!!!!!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ......

सुनील प्रभाकर भुमकर

वडाळा विधानसभा समन्वयक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या