✒️ भोंदूच्या प्रलोभनांना सुशिक्षित महिला फसल्या कशा?

 ✒️ भोंदूच्या प्रलोभनांना सुशिक्षित महिला फसल्या कशा?

वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 03/04/2026 :

भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे या प्रकरणातील पीडित महिला सुशिक्षित आणि काही उच्चशिक्षित असूनही त्या फसल्या कशा? त्यांनी आपले सर्वस्व खरातला ‘अर्पण’ केले कसे? शिक्षणामुळे व्यक्ती अधिक विवेकी बनते आणि ती सहजपणे फसत नाही, अशी समाजात प्रचलित असलेली धारणा आहे; मात्र, मानसशास्त्र याबाबत वेगळे चित्र दाखवते.

खरात प्रकरणात अडकलेल्या महिलांमध्ये बहुतांश पदवीधर आहेत.

 त्यात स्पर्धा परीक्षा देणारीही एक महिला आहे. खरे तर, शिक्षण म्हणजेच विवेक, तसेच सुशिक्षित असणे म्हणजे अंधश्रद्धेपासून पूर्णतः मुक्त असणे, असाच सर्वांचा समज असतो. पण हे गृहितक तितकेसे खरे नाही. शिक्षण माणसाला माहिती देते, बौद्धिक क्षमता वाढवते आणि विश्लेषणाची साधने देते; परंतु, भावनिक, मानसिक आणि सांस्कृतिक स्तरावर रुजलेल्या विश्वासांवर त्याचा नेहमीच तितकाच प्रभाव पडतो असे नाही. एखादी व्यक्ती कितीही शिकलेली असली तरी तिच्या आयुष्यातील काही टप्प्यांवर ती भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकते. 

कौटुंबिक कलह, वैवाहिक तणाव, करिअरमधील अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा एकटेपणाची भावना या सगळ्या गोष्टी व्यक्तीच्या मानसिक संतुलनावर परिणाम करतात. अशा अवस्थेत व्यक्तीला आधार, मार्गदर्शन किंवा कुणीतरी आपले म्हणावे अशी गरज तीव्रतेने जाणवते. याच मानसिक अवस्थेचा फायदा खरातसारखे भोंदू घेतात. ते स्वतःला समस्या सोडवणारे, अध्यात्मिक मार्गदर्शक असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून सादर करतात. सुरुवातीला ते संबंधित व्यक्तीची अडचण समजून घेत असल्याचा आव आणतात. समोरच्याला शांतपणे ऐकून घेणे, सहानुभूती दाखवणे आणि ‘तुमची समस्या मला कळते’, असे सांगणे, या साध्या वाटणाऱ्या कृतींमधून विश्वासाचा पाया तयार होतो. हा विश्वास जितका वाढतो, तितकी त्या व्यक्तीची विचारशक्ती बाजूला पडू लागते. त्या महिलेला असे वाटू लागते की ‘हीच व्यक्ती मला समजते’, ‘हीच माझी समस्या सोडवू शकते’. यातून स्पष्ट होते की, सुशिक्षित असणे म्हणजे सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित असणे नाही. शिक्षणाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची सवय आणि भावनिक जागरूकता यांचीही गरज असते.

अशी होती खरातची मोडस ऑपरेंडी

अशोक खरात महिलांशी भरपूर गप्पा करायचा. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचा. सहानुभूतीचे डोस पाजायचा. आधीच मिळविलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटना सांगायचा. तो कृष्णाचा अवतार आहे, असे भासवून ही माहिती तो सांगत. साक्षात देव आपल्याशी संवाद साधत आहे, यावर महिलांचा विश्वास पटल्यावर त्या काहीही करायला तयार व्हायच्या. जेव्हा खरात हा ‘उपचार’, ‘उपाय’ किंवा ‘दैवी कृपा’ या नावाखाली काहीतरी करण्यास प्रवृत्त करत असे, तेव्हा महिला त्या लैंगिक संबंध ठेवण्यासही संमती देत. या लैंगिक संमतीच्या मागे भीती आणि चुकीचा विश्वास होता. त्यामुळे ती संमती खरी स्वायत्त नव्हती तर, ती एका प्रकारच्या मानसिक प्रभावाखाली दिलेली होती. 

विवाहित महिलाही कशा अडकल्या?

वैवाहिक आयुष्य केवळ सामाजिक करार नसतो; तो भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजांचा एकत्रित प्रवाह असतो. जेव्हा या प्रवाहात कुठे अडथळा निर्माण होतो, संवादाचा अभाव, दुर्लक्ष, भावनिक दुरावा किंवा शारीरिक अपूर्णता या बाबी येतात तेव्हा त्या नात्यातील एक व्यक्ती आतून पोकळी अनुभवू लागते. ही पोकळी केवळ शरीराची नसते तर, ती समजून घेण्याची, जवळीकतेची आणि स्वतःच्या अस्तित्वाची दखल घेतली जाण्याची असते. भारतीय समाजरचनेत स्त्रियांच्या भावनिक आणि लैंगिक गरजांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झालेले दिसते. ‘समाधानी पत्नी’ ही कल्पना अनेकदा तिच्या स्वतःच्या इच्छांना दुय्यम ठरवून उभी राहते. त्यामुळे जेव्हा तिच्या आयुष्यात कोणी तिचे बोलणे ऐकणारा, तिच्या वेदना समजून घेणारा किंवा तिला महत्त्व देणारा म्हणून पुढे येतो, तेव्हा त्या व्यक्तीकडे तिचा ओढा निर्माण होऊ शकतो. हे केवळ शारीरिक आकर्षण नसते; तर तो एक प्रकारचा भावनिक आश्रयस्थान शोधण्याचा प्रयत्न असतो. कारण तेथे तिला नाकारलेले काहीतरी मिळत असल्याची भावना असते. मात्र, ही भावनिक गुंतवणूक अनेकदा वास्तव आणि भास यांच्या सीमारेषा पुसून टाकते. समोरची व्यक्ती खरोखरच आधार देणारी आहे की केवळ परिस्थितीचा फायदा घेणारी, हे ओळखणे कठीण होऊन बसते. अर्थात, समाजातील मोजक्या महिलांबरोबर असा प्रकार होतो.

पतीच्या अफेअरची दिली जात होती माहिती

खरात ज्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तो आधीच सूक्ष्मपणे गोळा करून ठेवायचा. विशेषतः त्यांच्या पतींबाबत त्यांचे वागणे, सवयी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुणाशी तरी संबंध असल्याच्या कुजबुजीपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करायचा. ही माहिती काही वेळा वस्तुस्थितीवर आधारलेली असायची तर, कधी केवळ अफवांच्या धाग्यांनी विणलेली असायची. पण, खरात ती मांडताना कधीच संदिग्ध वाटत नसे. उलट, तो अत्यंत ठामपणे, डोळ्यांत डोळे घालून, ‘तुझ्या पतीचे अमूक व्यक्तीसोबत अफेअर आहे’, असे सांगायचा. जणू काही अदृश्य शक्तींच्या आधारे त्याने सत्य उलगडलेले आहे. अनेकदा त्या स्त्रीच्या मनात आधीच शंकेची एक हलकीशी रेषा असायची. खरातच्या या आत्मविश्वासपूर्ण विधानाने त्या शंकेला जणू पुष्टी मिळायची. त्याच्या कथित ‘दैवी जाणिवे’मुळे तो पतीचे गुपित उघड करू शकतो, असा समज तिच्या मनात दृढ होत जाई. परिणामी, पतीविषयी असलेला विश्वास डळमळीत होऊ लागायचा आणि त्याजागी नाराजी, दुःख व नैराश्याच्या छटा दाटून येत. याच मानसिक अवस्थेचा खरात अचूक अंदाज घेत असे. जिथे मन कमकुवत झालेले असते, तिथे तो ‘आधार’ बनून उभा राहायचा. समजून घेणारा, सांत्वन करणारा आणि हळूहळू त्या भावनिक पोकळीवर आपले वर्चस्व निर्माण करणारा म्हणून त्याचे स्थान बळकट व्हायचे. या प्रक्रियेत ती महिला नकळतपणे त्याच्यावर विश्वास ठेवू लागायची व त्याच्या जाळ्यात अलगद अडकायची.

✒️🟣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या