🟪 बिबट्याच्या हल्यात ५ वर्षाच्या राजवीरचा मृत्यु.
💢 वन्यप्राण्यांचा बंदोबस्त बंदोबस्त करावा - संजय वाघमोडे
वृत्त एकसत्ता न्यूज
कोल्हापूर दिनांक 01/02/2026 :
बिऊर शिराळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या लहानग्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवार दि.३० जानेवारी२०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राजवीर व त्याची लहान बहीण कार्तिकी (वय ४) आपल्या घरातून शेजारील घरात खेळत निघाले होते. यावेळी अचानकपणे बिबट्याने येऊन राजवीरवर हल्ला केला. राजवीर सोबत असणारी बहीण कार्तिकी ओरडत पाठीमागे घरी पळाली व घरातील लोकांना घडला प्रकार सांगितला. राजवीरची आई व वडील ओरडत बिबट्याचा पाठलाग करू लागले. बिबट्या राजवीरची मान जबड्यात घट्ट पकडून पुढे व राजवीरचे आई वडील मागे असा थरारक पाठलाग तीनशे फुटांपर्यंत सुरू होता. आरडाओरडा सुरू ऐकून इतर लोक व समोर उसाचा फड पेटवलेला व शेतकरी समोर पाहून बिबट्या बाजूला असणाऱ्या झाडीत राजवीर ला घेऊन घुसला. तोपर्यंत रानात काम करणारे व शेजारील नागरिक जमा होऊन बिबट्या गेलेल्या दिशेने बिबट्याचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत बिबट्याने राजवीरला गळ्याला धरून सुमारे पाचशे फुटांवर शंकर केरू पाटील यांच्या शेतापर्यंत फरफटत नेले होते. समोर आग आणि लोकांचा जमाव आरडाओरड पाहून बिबट्याने राजवीरला सोडून धूम ठोकली. राजवीरचे आजोबा शंकर श्रीपती पाटील यांनी बॅटरीच्या झोतात पाहिले असता, राजवीर ओढ्यालगत जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्याला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉ. दीपक बनसोडे, अनिरुद्ध काकडे यांनी मृत झाल्याचे घोषित केले.
बिबट्या या हल्ल्यानंतर अर्ध्या तासाने याच परिसरात हाकलून लावूनही दोन तीन वेळा परत आला व राजवीर च्या वडीलांवर चौथ्यांदा येऊन हल्ला केला. परंतु या हल्ल्यात राजवीर वडील जमाव जास्त असल्याने वाचले. बिबट्याचे तोंडाला रक्त माखले होते. असे प्रत्यक्ष पहाणाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा बिबट्या नरभक्षक बनल्याचे दिसून येते. गंभीर घटना घडूनही रात्री दहा वाजले तरी वन विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांचा रोष आणखी वाढत गेला.
घडलेल्या प्रकार समजताच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ विकास समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष अतुल धनगर, संपत रुपने, सिध्दसाहेब, इत्यादी पदाधिकाऱ्यांसह सोबत राजवीर च्या कुटुंबीयांची बिऊर येथे घरी जाऊन रात्री आठ वाजता भेट घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी बोलताना संजय वाघमोडे यांनी सांगितले की, प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अस्वल, बिबट्या, गवे, इत्यादी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलांचा व मोठ्या नागरिकांचा बळी गेला आहे.
वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. तसेच शाहूवाडी शिराळा वाळवा चंदगड आजरा भुदरगड राधानगरी व गगनबावडा या तालुक्यातील नागरी भयभीत झाले आहेत.
शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी किंवा असे नरभक्षक वन्य प्राण्यांना सरकारने ठार मारून त्यांची संख्या मर्यादित करावी. याबाबत शेतकरी, नागरिकांनी आपल्या गावची सर्वसाधारण ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत वन्य प्राण्यांना ठार मारण्याबाबत ठराव मंजूर करून ते सरकारला पाठवावेत एखादी घटना घडली की हळहळ व्यक्त होते. नंतर विसरून जाते. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन याबाबतीत आवाज उठवला पाहिजे. आपल्या सर्वांच्या बरोबर यशवंत क्रांती संघटना नेहमीच पाठीशी ठामपणे उभे राहील.


0 टिप्पण्या