संजीवन समाधी सोहळा

संजीवन समाधी सोहळा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 16/11/2025 :

 आजची पहाट म्हणजे आळंदीकरासाठी डोळ्यातुन टप टप अश्रु ढाळणारा दिवस ठरला होता. कारण, ११ डिसेंबर २०२३ आजच्या दिवशी, गुरुवार शके १२१८ कार्तिक वद्य त्रयोदशीला (इ.स.१२९६) विश्वाला तत्वज्ञानाचे धडे शिकविणाऱ्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवन समाधी दिन निश्चित केला होता. 

   पाचांसहित लयातीत जालिये वो |

     अनुसरले प्रेमभक्ति काळ्या रूपासि वो ||

संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे. योग्याच्या समाधीमध्ये पंचमहाभूतांपैकी पृथ्वी व जल हे तत्त्व झडून जाते व तो योगी वायुरूपाने अथवा तेजोरूपाने उरतो. ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र आपण पंचमहाभूतांसहित लयातीत म्हणजे अमर झालो आहोत असे सांगितले आहे. हे त्यांनी विठ्ठल भक्तीने साध्य केले.

 माऊलींचे अवतार कार्य संपल्याने त्यांना हा तात्पुरता कल्याणासाठी मिळालेल्या देहाची आणि आत्म्याची मोकळीक करायची होती.

कोणाचें हें घर हा देह कोणाचा ।

आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥

 जनसामान्याला त्याचा देह.. घर संपत्ती.. पद.. प्रतिष्ठेचा अभिमान असतो. पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे.. त्याचा मालक कोण ठाऊक नसते.

 ज्ञानेश्वर माऊली हे कर्मयोगी होते यात कुणालाच शंका नाही. गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तर माऊलींनी ज्याप्रकारे विस्तृतपणे दिली त्यावरुन हे सिद्ध होते. जे योगी असतात ते जन्मभर भगवंताचे नामस्मरण करतात...

     निवृत्ति सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु ।

     अळंकापुरीं स्थापियेलें दिधला विठ्ठल उच्चारु ।

     समाधि जीवन माझें वरी अजानवृक्षतरु ॥

     जोंवरी चंद्रसूर्य तोंवरी कीर्तिघट स्थिरु ॥

 यातील वर्णनसुद्धा समाधीमधे माऊली विठ्ठल नामाचा उच्चार करत आहे असे दाखवते. 

 ज्यांनी इंद्रियविजय प्राप्त केलेला असतो, ते योगी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून दूर असतात. त्यांच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही. सुख असो वा दुःख ते समबुद्धीनेच बघून अविचल असतात.

 अशा योगीजनांना अंतकालाची जाणीव होते. त्यांच्या डोक्यात अंतःकाली भगवंताशिवाय कोणतेच विषय नसल्याने, ते इच्छापुर्तीसाठी पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अंतकाळी देहाला यातनाही होत नाहीत. ते मायेला दूर सारुन आनंदाने परमधामात येतात.

 त्या संजीवनी समाधी सोहळ्याचे वर्णन तरी किती करायचे ! त्या साठी शब्द तोकडे पडतात !.

 तुळशीच्या.. फुलांच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरुंना वंदन करुन 'ॐ कार' स्मरण करतात, तेव्हा या प्रिय भक्ताला आदि.. अनंत अर्थातच कधीही नष्ट न होणाऱ्या अक्षरधामात.. परमधामात सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अवतरतात. जन्मानंतर परमेश्वराने सोपविलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते.

 ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात हेच दृश्य होते. उपस्थित संतजनांना याची कल्पना होती. पण तरीही उपस्थित कुणालाही भावनावेग आवरणे शक्य नव्हते. माऊलींनी त्यांना त्रास देणाऱ्यांविषयीही अवाक्षर काढले नाही. याउलट त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला. समतेची वाट सर्वाना दाखवली. ज्ञानेश्वरी.. चांगदेव पासष्टी.. हरिपाठ.. अमृतानुभव जगाला अर्पण केला. माऊलीचे ज्ञानामृत भक्ताना सदैव संजीवनीच देत आहे.

 माऊलींचा देह जरी पंचमहाभूतामध्ये विलीन पावला तरीही आत्मरुप चैतन्य उर्जा... त्याची स्पंदने मात्र भागवत भक्तांना जाणवतात. भौतिक जगातील सुखदुःखात सुख.. समाधान.. मनःशांती आणि माऊलीनी देशाला आनंदी जीवनासाठी दीशा दिली. त्यामुळेच गावोगाव हरिनामाचा गजर सुरु झाला.

 पुढे अनेक संतांनीही भगवद पंथास आणखी पूढे नेले. या भक्तीच्या इमारतीचे तुकोबांनी कळस केला. त्यांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक यांनी त्याचे सुंदर वर्णन केले आहे ;

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनी जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

आज या विश्वात भारताची ओळख आध्यात्मिक देश म्हणून आहे. निवृत्तीनाथांनी माऊलींच्या मनात रोवलेल्या मोगऱ्यांच्या फुलांचा सुगंध जगभर पसरला. जग भारताकडे विश्वगुरु म्हणून बघू लागलेय.

 खालील गीतातून अगदी ह्रदयद्रावक भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. स्वतःच्या धाकट्या बंधुला संत निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी स्थळाकडे घेऊन जावे लागले होते.

     समाधी घेऊन जाई ज्ञानदेव ।

     सोहळा अपूर्व जाहला गे माये ।।

     निवृत्तीनाथांनी चालविले हाती ।

     पाहुन ती मूर्ती धन्य वाटे ।

     आपण निर्गुण मागे परी दान।

     विश्वाचे कल्याण-निरूपण ।।

     सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ ।

     मायेचे हे बळ राया बोले ।

     ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट ।

     फुटली पहाट ब्रम्हज्ञान ।

     नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो ।

     वैकुंठासी जातो ज्ञानराया ।

     सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ ।

     सज्जनाचे बळ समाधान ।।

     गुरू देई शिष्या समाधी आपण ।

     देवा ऐसे मन का बा केले !

     पद्माचे आसन घालविले जाण ।

     ओंकार ते पूर्ण पंचप्राण ।।

     पैलतिरी हाक आली आज कानी ।

     करूनी निर्वाणी बोलविले ।

     ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला ।

     कैवल्यचि झाला भक्तजन ।।


 कवी बा. भ. बोरकर यांनी या सोहळ्याचे अगदी ह्रदयाला भिडणारे वर्णन केले आहे;

 'रडणे बरे दिसणार नाही' म्हणून महत्प्रयासाने अश्रूंना थोपवून धरले तरी त्या सार्‍यांचेच कंठ पुन:पुन्हा दाटून येत होते. ज्या भिंतीवर बसून चारही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती ती भिंतदेखील दु:खावेगाने कोसळली !. एरवी कुठल्याही बर्‍यावाईट घटनेला वा अडीअडचणीला धीराने सामोरे जाणारे संत आणि गंभीर वृत्तीचे सज्जनही पार गोंधळून गेले.

संत ज्ञानदेवांची भक्ती करणारे बोरकर त्यांच्या समाधीचा कारून प्रसंग रंगवताना म्हणतात;

     ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत।

     वेद झाले रानभरी, गोंधळले संत ।।

     ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी ।

     मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।

     ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ती ।

     आसवांच्या डोही, झाली विझू विझू ज्योती।।

     ज्ञानदेव गेला तेव्हा, तडा विटे गेला ।

     बाप रखमा देविवरु, कटीत वाकला ।।

     ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।

     लागोपाठ भावंडें, तीं गेली निजधामा।।

     माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।

     भरदुपारीं ही तशी, झाली तीनसांज।।

     तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।

     भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।

     इथे आळंदीत , आतां ऊर फाटे।

     पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।

     कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।

     एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।

अशा या विश्वाच्या माउलीने जनकल्याणा करीता जन्म घेऊन, अवतार कार्य संपताच संजीवन समाधी घेतली. त्या माऊलीच्या चरणी दोन्ही हात आणि मस्तक ठेवून कोटी कोटी वंदन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या