रानभाजी - पिंपळ
शास्त्रीय नाव : Ficus religiosa
कुळ : Moraceae
स्थानिक नावे : अश्वत्थ, पिप्पल, बोधीम
इंग्रजी नाव : Piple
वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रवीण सरवदे /आकाश भा.नायकुडे
दिनांक 21ऑगस्ट 2024 :
पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषतः हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा, कोलकाता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. या वृुक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच 'ज्ञानाचा वृक्ष' म्हटले जाते. हा वृक्ष बिहार मधील बोधगया येथे आहे. पिंपळाची उंची १० ते १५ मीटर पर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची, आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात. अग्रस्थ अंकुर, उपपर्णानी झाकलेला, उपपर्णे लांबट तांबूस गुलाबी असतात. हिरव्या रंगाची फुले, अतिशय लहान आकाराच्या गडू सारखी दिसतात. याचे पुष्पाशय (फळासारखा दिसणारा भाग) पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये तीन पाकळ्यांची नरपुष्पे व पाच पाकळ्याची मादीपुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात. हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती, वासे, खांब यांमधे वाढून घराला हानी निर्माण करतो.
औषधी व अन्य वापर
पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे करतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकार यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो.
पिंपळाच्या पानांची भाजी
# साहित्य - २ वाट्या पिंपळाची देठासहित कोवळी पाने, थोडी चिंच, चार लसुण पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या, तेल, मीठ, इत्यादी.
# कृती - पाने चिरून धुवून घ्यावीत. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. चिरलेली पाने वाफवून घ्यावीत. पाणी टाकून द्यावे. तेलात लसूण नि मिरच्या टाकाव्या. नंतर वाफलेली भाजी टाकावी. चिंच टाकावी. चवी पुरते मीठ टाकून भाजी शिजू द्यावी.
संदर्भ : विकिपीडिया
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या