जिना नसले तर काय झाले? शरद पवार आहेत ना…_

 

जिना नसले तर काय झाले? शरद पवार आहेत ना....

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज

अकलूज दिनांक 31 ऑगस्ट 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार यांनी पुन्हा एकदा पत्ते पिसायला सुरूवात केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआच्या बाजूने मुस्लीमांचे एकगठ्ठा मतदान झाले. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने पवारांनी आता कंबर कसली आहे. मुस्लीमांना विधानसभेसह सर्व निवडणुकांमध्ये आरक्षण मिळायला हवे, पूर्ण संधी मिळायला हवी, अशी मागणी पवारांनी केलेली आहे. मुस्लीम धार्जिण्या राजकारणामुळे या देशाची फाळणी झाली. मोहमद अली जिना यांनी मुस्लीमांचे नेतृत्व केले. आता पवारांसारखे नेते त्यांची गादी चालवताहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल केंद्रातील मोदी सरकारला हलवू शकले नाहीत. परंतु, या निवडणुकीत एक गोष्ट मात्र निश्चितपणे घडली. मोदींनी गेली १० वर्षे गाडून टाकले मुस्लीम एकगठ्ठा मतांचे भूत, पुन्हा एकदा जिवंत झाले. अनेक नेत्यांच्या मानगुटीवर बसले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, प. बंगाल या राज्यांमध्ये मुस्लीम मतदारांनी भाजपाचे संख्या गणित पार उद्ध्वस्त करून टाकले. ४०० पार… कडे नजर लावून बसलेल्या भाजपाच्या नेत्यांना साध्या बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. या निकालाचा हँगओव्हर पवारांसारख्या नेत्यावर आजही कायम आहे. आधीच मुस्लीम मतांमुळे संमोहित असलेले पवार आता झपाटल्यागत वागत आहेत. ते मुस्लीमांना राजकीय आरक्षणाचे दिवास्वप्न दाखवत आहेत. राखीव मतदारसंघांची ही तिच मागणी आहे जी फाळणीच्या आधी मुस्लीम लीगचे नेते मोहमदअली जिना यांनी केलेली होती. फाळणीच्या दु:स्वप्नाची सुरुवात इथूनच झाली. पवारांना हा इतिहास माहित नाही असे नाही. परंतु सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची काँगेसची परंपरा आहे. पवार याच परंपरेत वाढले आहेत. या परंपरेचा त्यांना गर्वही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते तुष्टीकरणाचा खतरनाक खेळ खेळायला सज्ज झाले आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाबाबत कायम मूग गिळून बसलेले हे पवार मुस्लीमांच्या आरक्षणाबाबत जाहीरपणे शड्डू ठोकत आहेत. मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या पवारांना मुस्लीमांच्या राजकीय आरक्षणाबाबत मात्र कायद्याच्या चौकटीची चिंता दिसत नाही.

सकाळ संध्याकाळ संविधानाचा घोषा करणारे हे नेते, असे आश्वासन देत आहेत, जे संविधानाच्या मूलतत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. मुस्लीम मतांची ही झिंग एवढी आहे, की आपण जे काही बोलत आहोत त्याचा हिंदू मतदारांवर काय परिणाम होईल याचा विचार करण्याची गरजही पवारांसारख्या नेत्याला वाटत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत कायम नकारार्थी भूमिका घेणाऱ्या शरद पवारांनी मुस्लीमांचे मात्र कायम समर्थन केलेले आहे. चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी मराठ्यांना कधीही आरक्षण दिले नाही. ना तसा प्रयत्न केला. परंतु, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने जेव्हा मराठा आरक्षणचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले टाकली, तेव्हा मात्र मराठ्यांसोबत मुस्लीमांनाही आरक्षण मिळायला हवे, असा पेच टाकून या पश्नाचा गुंता वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पक्षाच्या मायनॉरीटी मोर्चाच्या मेळाव्यात बोलताना पवारांनी पुन्हा एकदा मुस्लीम धार्जिणी भूमिका घेतली. मुस्लीमांच्या राजकीय आरक्षणासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. अल्पसंख्यांक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना पवारांना कायम उत्साहाचे भरते आलेले असते. नरेंद्र मोदी यांना ४०० पारच्या लक्ष्यापासून रोखण्याचे काम देशातील अल्पसंख्यकांनी केले, असे प्रशस्तीपत्रक देत पवारांनी या कार्यक्रमात मुस्लीम मतदारांचे भरभरून कौतूक केले. लोकसभा निवडणुकीत मविआच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केल्याबद्दल त्यांनी मुस्लीमांचे आभार मानले. वक्फ कायद्यात ढवळाढवळ करीत असल्याची टीका करत त्यांनी केंद्र सरकारवरही तोफ डागली. वक्फ बोर्डात काय करायचे याबाबतचा निर्णय मुस्लीम समाजानेच घ्यावा, असे पवार म्हणाले. थोडक्यात वक्फने एखाद्या मंदिराच्या जमीनीवर, एखाद्या पुरातन वास्तूवर, पूर्णच्या पूर्ण गावावर दावा सांगितला तरी आपली त्याला हरकत नाही, असे जणू त्यांना सुचवायचे होते.

महाराष्ट्रात मुस्लीम मतांचा टक्का साधारण १० त १२ टक्के आहे. ही मतं एकगठ्ठा पडतात म्हणून मुस्लीमांना विधानसभेत आरक्षणापासून वक्फ बोर्डाला कोणत्याही जमीनीवर हात ठेवण्याचा अधिकार द्यायाला पवार तयार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या स्थापनेमागे मुस्लीम मतांमध्ये होणारी फाटाफूट टाळणे हा मुख्य उद्देश होता. फक्त दहा ते बारा टक्के मतांवर पवारांसारखे नेते इतके विसंबून असतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हिंदू मतदार जातींमध्ये विभागला गेलेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीमध्ये असलेल्या चिरण्या आता रुंद भेगांमध्ये रुपांतरीत झालेल्या आहेत. एका बाजूला या भेगा अधिक रुंद व्हाव्या म्हणून प्रयत्न करणारे पवार मुस्लीमांना मात्र संघटीत व्हा असा संदेश देतायतय. मुस्लीम कट्टरतावादामुळे जग संकटात आलेले आहे, त्या कट्टरवादाला वक्फ सारख्या मुद्द्यावरून फुंकर घालण्याचे काम पवार करतायत. फाळणीच्या काळात काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेवर येण्याची घाई होती म्हणून ते मुस्लीम कट्टरतावादासमोर झुकले. पवारांना विधानसभा जिंकायची आहे, म्हणून ते कट्टरवाद्यांना कुरवाळण्याचे काम करतायत.(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या