🧿 स्वतःच स्वतःचे मन तपासावे !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/9/2026 :
स्वतःच स्वतःच्या मनाचे परीक्षण करावे, सजग बुद्धी (सचित) हेच आरशासारखे प्रतिबिंब दाखवणारे आहे. स्वतःच स्वतःचे मन तपासावे, म्हणजे आपल्या विचारांचे, भावनांचे आणि कृतीचे स्वपरीक्षण करावे. आपल्यातील चांगले-वाईट, लोभ-द्वेष यांचा विचार करा. जसे आरशात आपला चेहरा दिसतो, तसेच शुद्ध आणि जागरूक मनात आपली खरी स्थिती दिसत असते.
आपले मन निर्मळ, जागरूक आणि सत्यशील ठेवा; कारण तेच आपल्या स्वभावाचे आणि कर्माचे खरे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. मन हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ते अदृश्य असले तरी त्याचा प्रभाव सर्वत्र दिसतो. मन डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचे परिणाम आपल्या वर्तन, बोलणे, विचार यातून दिसतात. मन सतत एका विचारातून दुसऱ्याकडे धावते. म्हणून बुद्धांनी म्हटले आहे, मन समजणे आणि नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
थोडे चांगले बोलले तर आनंदी, थोडे वाईट झाले तर दुःखी अशी त्याची रचना आहे. मनात कल्पना, विचार आणि निर्माणशक्ती असते. कला, विज्ञान, धम्म सगळे मनातून जन्म घेते. मनाने ठरवले तर अशक्यही शक्य होते. म्हणून म्हणतात, ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. मनाची अनेक रूपं किंवा स्तर दिसतात.
शांत मन, समाधानी, स्थिर, विचारपूर्वक वागणारे, ध्यानात, समाधीत दिसतं. चंचल मन सतत बदलणारे, एका विचारावर न थांबणारे, अशांत, द्वेष, राग, लोभ, चिंता यांनी व्यापलेले मन. सजग मन (सचित्त) जागरूक, विचारशील, आपल्या कृतींचे निरीक्षण करणारे असते. निर्मळ मन अहंकार, मत्सर, द्वेष विरहित, करुणा व मैत्रीने भरलेले असते. अंधकारमय मन अज्ञान, मोह, भ्रम यांत गुंतलेले असते. तर प्रबुद्ध मन समजूतदार, समत्व राखणारे, धम्मानुसार चालणारे असते. म्हणून ते शुद्ध, सजग आणि प्रेमळ ठेवणे हेच खऱ्या अर्थाने जीवनाची सार्थकता आहे.
तथागत गौतम बुद्धांनी मन या विषयावर अतिशय सखोल आणि वैज्ञानिक विचार मांडले आहेत. बुद्ध धम्मात मन हे निर्मितीचे केंद्र मानले गेले आहे. सर्व गोष्टी मनातून उत्पन्न होतात; मनच सर्व गोष्टींचे मूळ आहे; मनानेच त्या बनतात. आपले बोलणे, कृती आणि जीवन यांचे बीज मनातल्या विचारात असते. चांगले विचार असतील तर जीवन आनंदी होते, आणि वाईट विचार असतील तर दुःख निर्माण होते.
मन नियंत्रणात ठेवणे फार अवघड आहे; ते वेगाने फिरते, बदलते आणि कुठेही पळते. म्हणून बुद्ध सांगतात की, मनावर स्मृती (सती) आणि संयम (संवर) ठेवणे आवश्यक आहे. ध्यानभावना मनाला स्थिर आणि निर्मळ करण्याचा मार्ग आहे. जेव्हा मन नियंत्रित आणि निर्मळ होते, तेव्हा खरे सुख प्राप्त होते. मन शांत झाले की द्वेष, लोभ, मोह नाहीसे होतात. अशा अवस्थेला बुद्धांनी निर्वाण म्हटले आहे. म्हणजेच पूर्ण मानसिक शांती.
शिस्तीत असलेले मन सुखाचे कारण आहे, आणि अनियंत्रित मन दुःखाचे कारण आहे. मन नियंत्रित केल्यास मनुष्य स्वतःला मुक्त करू शकतो; आणि मन जर विकारांनी व्यापले, तर तो स्वतःचे बंधन बनवतो. बुद्धांनी अनेक ठिकाणी मनाचे निरीक्षण, तपासणी आणि शुद्धीकरण करण्यावर भर दिला आहे. आपले आचरण, विचार आणि भावना स्वतः तपासा, म्हणजे आपण कुणाला त्रास देत नाही ना, आपण योग्य मार्गावर आहोत का हे पाहा.
चांगले (कुशल) कर्म करणे. आपले मन शुद्ध व स्वच्छ राखणे, हेच बुद्धांचे शासन आहे. जसे आपण आरशात आपला चेहरा पाहून धूळ साफ करतो, तसेच मनाच्या आरशात आपले विचार पाहून त्यातील द्वेष, लोभ, अहंकार दूर करावेत. स्वतःच स्वतःचा दीप बना. स्वतः मध्येच शरण जा. दुसऱ्याच्या आधारावर राहू नका. स्वतःच्या मनाचा प्रकाश पेटवा, स्वतःचे विचार तपासा, आणि योग्य-अयोग्य याचा निर्णय स्वतःच करा. स्वतःचे मन तपासल्या शिवाय त्यातील दोष दिसत नाहीत.
निरीक्षण, ध्यान आणि जागरूकता (सती) ही मन
तपासण्याची साधने आहेत. जेव्हा मन शुद्ध होते, तेव्हा जीवनही निर्मळ आणि मुक्त होते. मन म्हणजे केवळ विचार नसून ते जाणणे, अनुभवणे आणि प्रतिसाद देणे या सर्व गोष्टींचे मूळ आहे. मन लोभ, मोह, लालसा याने व्यापलेले मन. दोसचित्तं राग, मत्सर, द्वेष, सूड भावना असलेले असते. मन मोहचित्तं अज्ञान, भ्रम, चुकीची समज असलेले असते. मन समचित्तं समत्व असलेले, स्थिर, विचारपूर्वक कृती करणारी ही असते. करुणाचित्तं म्हणजे इतरांच्या दुःखाशी एकरूप होणारे, दयाळूही असते. मुदिताचित्तं म्हणजे इतरांच्या यशात आनंद मानणारे असावे. उपेक्षामय मन म्हणजे उपेक्षाचित्तं समभाव राखणारे, न-आवड न-नावड असलेले ही असते. प्रबुद्ध मन हे भवग्गवित्तं किंवा बोधिचित्तं समजूतदार, मुक्त, निर्वाणाकडे झुकलेले असते. बुद्धांनी सतीपठ्ठान सुत्त मध्ये सांगितले आहे की, मन जाणण्याचा मार्ग म्हणजे चित्तानुपस्सना म्हणजेच मनाचे निरीक्षण करणे.
जेव्हा मन रागीट असते, तेव्हा 'हे मन रागीट आहे' असे जाणावे. जेव्हा मन लोभी असते, तेव्हा 'हे मन लोभी आहे' असे जाणावे. जेव्हा मन शुद्ध आहे, तेव्हा 'हे मन शुद्ध आहे' असे जाणावे. मनावर नियंत्रण मिळवण्या आधी त्याला ओळखणे आवश्यक आहे. निरीक्षण करताना कोणताही दोष दडपायचा नाही, तर तो आहे हे जाणायचे आहे. यालाच बुद्धांनी सती म्हणजेच जागरूकता म्हटले आहे.
*मन जाणण्याचे टप्पे*
*१)* निरीक्षण (सती) - मनात काय चालले आहे हे पाहणे.
*२)* समज (संपजञा) - विचार, भावना कुठून आली हे जाणणे.
*३)* त्याग (विराग) - विकार सोडणे, शांतता वाढवणे.
*४)* शुद्धी (विपस्सना) - मनाला निर्मळ करणे, समजूतदार बनवणे. म्हणून दुःख निवारण्यासाठी स्वतःचे मन तपासणे, ओळखणे आणि त्याला शांत करणे हेच मुक्तीचे द्वार आहे. देह, वाणी आणि कर्म यांना दिशा देणारी शक्ती म्हणजे मन आहे.
मन प्रसन्न असेल तर जग सुंदर दिसते; आणि मन अस्थिर असेल तर जग दुःखी वाटते. मन जागृत झाले की माणूस स्वतःला समजू लागतो. तो आपले दोष, लोभ, राग, मत्सर ओळखतो. ज्या क्षणी माणूस स्वतःच्या विचारांचा निरीक्षक बनतो, त्या क्षणी तो स्वतःवर नियंत्रण मिळवतो. मनाच्या जागृतीमुळे माणूस दुःखाचे कारण स्वतः मध्ये शोधतो आणि बाहेरच्या गोष्टींना दोष देणे थांबवतो. त्यामुळे शांतता आणि समाधान प्राप्त होते. अशा मनात करुणा, मैत्री आणि क्षमा फुलतात. योग्य निर्णयक्षमता वाढते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.
अशांत मन शरीरावर वाईट परिणाम करते, तर शांत मन शरीरात संतुलन राखते. ध्यान, सती आणि जागृती यामुळे मेंदूचा ताण कमी होतो, झोप सुधारते आणि आनंदाची भावना वाढते. मन शुद्ध आणि जागृत झाले की विकार नाहीसे होतात.
लेखक : किशोर कासारे
मो. ८७६७४२५१८०
संकलक : 8793839488 *━═━═━═━═━═━═━═━═━═━═*
0 टिप्पण्या