☘️ रानभाजी : आघाडा ☘️


☘️ रानभाजी : आघाडा ☘️

 वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक1/8/2026 : 

महाराष्ट्रात आघाडा ही वनस्पती सर्वत्र आढळते. पाने साधी, एकासमोर एक, मऊ, केसाळ, फिकट हिरव्या रंगाचे असतात. फुलांचे दांडे फांद्यांच्या टोकांवर येतात. फळांवर लहान टोकदार काटे असल्याने अंगाला, कपड्यांना चिकटतात. आघाड्याला ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात फुले फळे येतात.

*भाजी बनवण्याची पध्दत*

# साहित्य : आघाड्याची कोवळी पाने, लसूण, कांदा, डाळीचे पीठ, तेल, तिखट, मीठ, जिरे, मोहरी.

# कृती - आघाड्याची पाने धुऊन, चिरून घ्यावीत.  कढईत तेल घेऊन त्यात जिरे मोहरीची फोडणी करून घ्यावी. त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात.  नंतर चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी. भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळूहळू भुरभुरुन टाकावे. सतत भाजी हलवत राहावी. एकसारखे हलवत राहिल्याने भाजी मोकळी होते. भाजी मंद गॅसवर शिजवून घ्यावी. भाकरी किंवा चपाती सोबत खायला अतीशय चविष्ट लागते.      

*आरोग्यदायी फायदे*

◆ पित्ताश्मरीत व अस्थी रोगात वापर. आमवात, क्षारयुक्त संधीशोध, गंडमाळा या रोगात गुणकारी.

◆ आघाडा मूत्रजनन आहे. त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते. यामुळे मूत्रपिंडोदरात उत्तम कार्य करतो. 

◆ लघवीची आम्लता कमी होते. मूत्रनलिकेचा दाह कमी होतो. यामुळे बस्तिशोथ, मूत्रपिंड शोथ, तसेच मूत्रंद्रियांच्या रोगात वापर.

◆ शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी बिया उपयुक्त आहेत.

◆ श्वासनलिकाशोथ व कफरोगात आघाड्याचा क्षार उपयुक्त आहे.

◆ विषमज्वरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण खायच्या पानांच्या रसातून देतात.

◆ आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत. उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात.

◆ विंचूदंशावर पाला वाटून लावतात, तसेच मूळ उगाळून पिण्यास देतात.

◆ रातांधळेपणात मुळाचे चूर्ण देतात.

◆ जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्ल पित्ताच्या त्रास कमी होतो.

◆ यकृतावर आघाड्याची क्रिया हितावह आहे. यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात.

◆ पित्ताश्मरीत व अर्थ रोगात आघाडा वापरतात. आमवात, क्षारयुक्त संधिशोथ, गंडमाळा या रोगात गुणकारी.

◆ दातदुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोळतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दातात भरतात.

◆ चामखीळ काढण्यासाठी आघाड्याचा क्षार वापरतात.

◆ कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेलात उकडून, वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालतात.

◆ सांधेवातात पाने ठेचून, गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर बांधतात.

◆ अंगात काटे शिरल्यास आघाड्याचा अंगरस देतात व पाने वाटून जखमेवर लावतात.

सोनाली कदम

सहाय्यक कृषी अधिकारी

आडगाव चोथवा, ता.येवला, जि.नाशिक

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या