⭕ महाळुंग येथील विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीस सात वर्ष सश्रम कारावास ; व एकूण दहा हजार रुपये दंडाची शिक्षा

🔷 अन्य पाच जण सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 25/05/2026 : गट नंबर २, महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील एका विवाहितेच्या छळ आणि आत्महत्येप्रकरणी माळशिरस येथील कोर्टात मे. अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश  ताम्हाणेकर यांनी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर उर्वरित ५ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.

​याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, याप्रकरणी फिर्यादी जेजरथ दशरथ भालेराव (रा. ऐरोली, मुंबई) यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी रविंद्र बिभीषण आढाव आणि इतर ७ जणांवर (रा. गट नंबर २, महाळुंग, ता. माळशिरस) अकलूज पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७५/२०१६, भारतीय दंड विधान संहिता (भा.द.वि.) कलम ४९८ (अ), ३०६, ३०४ (बी), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशिट) दाखल केले होते. माळशिरसचे अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश  ताम्हाणेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने मुख्य आरोपी रविंद्र आढाव याला ​भा.द.वि. कलम ३०४ (बी) अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास, ​भा.द.वि. कलम ३०६ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास आणि ३,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त सश्रम कारावास, व ​भा.द.वि. कलम ४९८ (अ) अन्वये १ वर्ष सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तर

​या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ ते ६ यांची सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष सुटका केली. 

​या केसमध्ये अकलूज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी योग्य मार्गदर्शन केले. सदर केस मध्ये सरकारी वकील  संग्राम एस. पाटील, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस हवालदार रियाज तांबोळी, हरीष भोसले  यांनी  काम पाहिले.