एक जहाज बातम्याभरून आलंय !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/03/2026 :
इराण युद्धात भारतीय व्यावसायिक तडफडू लागले असताना एक जहाज बातम्या भरून भारतात आलंय.
त्याचं झालंय काय,
इराण युद्धात भारतीय लोक इराण आणि अमेरिका अश्या दोन गटात विभागले गेलेत आणि अधिकतर भारतीय यंत्रणावर संतापलेत.
कसे का असेना?
आज गॅस साठी भारतात रांगा लागल्यात, कमर्शीअल गॅस मिळेना...... ही वस्तुस्थिती कोणीच नाकारू शकत नाही.
अश्या वेळी
इराणच्या हॉरमुज समुद्री मार्गातून एक जहाज मुंबईत दाखल झालंय. लायबेरीया देशाचे झेंडे असलेलं "शेलॉंग सुमॅक्स" नावाचं जहाज सव्वा लाख टन तेल घेऊन आलंय.
ही झाली मुख्य बातमी.
पण या जहाजात तेल कमी बातम्या जास्त आल्यात का? असा प्रश्न पडलाय.
कारण,
इराणनं भारताला दिली सूट,
शेवटी जुन्या मित्रानेच मित्राचं दुःख जाणलं,
इराणला भारतीय जनतेवर प्रेम आहे,
तेलानं धर्म नाही पाहिला
असं एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला
भारतानं इराणवर आणला दबाव,
मोदीपुढं इराणचं काही चाललं नाही,
भारत नौदल उतरवणार म्हणून इराण भिला
भारताच्या कूटनितीचा हा विजय आहे
अश्या दोन्ही बाजूनं बातम्या जहाजातून उतरल्या आहेत. तुमच्या जवळच्या पंपातून त्या तुमच्या डोक्यात सोडल्या जातील.
वास्तविक,
हॉरमुजवर इराण नेहमीच हक्क सांगत आलाय. आत्ता इराणनं इस्राईल, अमेरिकेकडं जाणारी तसेच सर्वच अरब राष्ट्राची वाहतूक अडवली आहेत.
त्यात इतर राष्ट्राची जी जहाजे आहेत त्यावर काही आगळीक घडली तर त्यांच्या विमा कंपन्यानी हात वर केले आहेत, त्यामुळं सगळीच जहाज वाहतूक बंद होती.
आता त्या त्या राष्ट्राचा संवाद होतोय. प्रत्येक जहाजाची खात्री करून वाहतूक सुरळीत होत आहे.
झेंडे बघून जाऊ देत आहेत?
अनेक मिडिया हाऊसमध्ये जहाजाना "झेंडे बघून जाऊ दिलं जातंय" असं सांगितलं जातंय.
म्हणजे
एक्सप्रेस हायवेवर MH10 ची गाडी सोडली जातेय MH01 ते 05 च्या कार अडवल्या जातंयत असं म्हंटल्या सारखं झालं.
अहो, ते जहाज आहे.
त्यावर अतिप्रगत तंत्रज्ञान आहे. रडार आहे.
आणि अडवायला काठी घेऊन कोणी पोलीस थांबलेला नाहीये तर इराणचं सैन्य दल आहे. इस्राईलमधल्या अमुक शहरातील तमुक इमारत नष्ट करणारा इराण अंगणात आलेलं पाखरू काय छडीनं उडवणार आहे?
आणि टाळ्या काय वाजवताय?
मुळात सध्या टंचाई आहे ती lpg गॅसची.
आलेलं जहाज हे तेलाचं आहे?
आलेल्या क्रूड ऑइल मधूनही lpg गॅस तयार करता येतो मात्र आलेल्या तेलातून पेट्रोल, डिझेल आणि गॅस किती प्रमाणात रिफाईन केलं जाणार हे निश्चित नाहीये.
तसेच
भारताला लागणारा 55 ते 60 टक्के गॅस आखाती देशातून येतो. आता जरी इराणनं भारताकडे जाणाऱ्या जहाजांना परवानगी दिली असली तरी ज्या देशातून ही जहाजं येणार आहेत त्यांना परवानगी दिली आहे का?
आज जे
"एक जहाज आलं म्हणजे गॅस पुरवठा सुरळीत झाला" असं चित्र निर्माण केलं जातंय तेही चूक आहे.
गॅस पुरवठा सुद्धा सुरळीत होईल पण त्याला अजून आठवड्यांचा अवधी लागणार
तोवर
जहाजातून आलेल्या बातम्या भरत बसायला लागणार !
खरं तर हॉरमुज खाडीतून आणखी दोन जहाजं निघाल्याचं सांगण्यात आलं आहे. पण आत्ता मुद्दा आहे तो गॅसचा पेट्रोल - डिझेलचा नव्हेच !
विनायक वाडकर,सर. पुणे / कोल्हापूर.

0 टिप्पण्या