यात्रेनिमित्त अकलूजचे ग्रामदेवी अकलाई मंदिरात विशेष स्वच्छता उपक्रम
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 06/07/2025 :
अकलूज गावची ग्रामदेवता श्री अकलाई देवीची यात्रा (भंडारा) शुक्रवार दि.११ रोजी होणार आहे. त्यानिमीत्त अकलूज गावातील विविध मंडळे, सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी अकलाई मंदिर व परिसराची साफसफाई करून स्वच्छता केली. मंदिर स्वच्छता अभियानाचा उपक्रम अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांनी सन १९८० सालापासून सुरू केला असून आजतागायत जवळ जवळ ४५ वर्षा पासून अकलूजमधील विविध मंडळे,सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून राबविला जात आहे. यामध्ये पाण्याने मंदिराच्या शिखरापासून मंदिराचा गाभारा व परिसर स्वच्छ धुऊन काढला जातो. तसेच देवीच्या मंदिरातील विविध भांडी आरती ताट, समई, पितळेची घंटा इत्यादींची घासून स्वच्छता करण्यात येते.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दल व अकलूज नगरपरिषदेच्या टॅंकरने मंदिर स्वच्छतेसाठी पाणी देऊन सहकार्य केले. स्वच्छता करण्यासाठी अकलाई देवी भक्त मंडळ, साईबाबा सेवा ट्रस्ट, लोकमान्य गणेश मंडळ, शिवरत्न गणेश मंडळ, पगडीचा राजा गणेश मंडळ, स्वामी भक्त मंडळ, क्रांतीसिंह रिक्षा स्टाॅप, वीरशैव लिंगायत समाज, वडर समाज, बुरूड समाज, मातंग समाज, बौद्ध समाजातील युवकांनी सहकार्य केले. हा उपक्रम पार पडण्यासाठी किशोरसिंह माने-पाटील यांचे मित्र मंडळ त्रिंबक तात्या गुळवे, विठ्ठल गायकवाड, ॲड.राजू आर्वे, उमेश शेटे, अशोक गुजर, बाळासाहेब रिसवडकर, रशीद तांबोळी, विजय टोंगळे व अकलाई देवीचे पुजारी गुरव बंधू यांचे सहकार्य लाभले."अकलाई देवीच्या मंदिरात गत ४५ वर्षांपासून हे भक्तगण मंदिर परिसराची साफसफाई व स्वच्छतेसाठी येत आहेत. पण यामधील काही लोक वयोवृद्ध झाली आहेत. त्यामुळे पुढील वर्षीपासून नवीन तरूण वर्गांनी या उपक्रमात सहभागी होऊन ही परंपरा पुढे चालू ठेवावी." - किशोरसिंह माने-पाटील (माजी सरपंच,अकलूज ग्रामपंचायत)
0 टिप्पण्या