इथे ओशाळला महाराष्ट्र माझा

 इथे ओशाळला महाराष्ट्र माझा

वृत्त एकसत्ता न्यूज

श्रीपूर दिनांक 28/03/2025 : ज्यांना आमचे गुरुजी म्हणून आदराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतात ते वाचाळवीर संभाजी भिडे यांच्या डोक्यातून दर महिन्याला, सहा महिन्यांत वादग्रस्त विधाने येतात व त्यामुळे पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भिती वाटते. समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. संभाजी भिडे यांचे वय झाले आहे त्यामुळे वयोमानानुसार ते बरळत असतात असा एकंदरीत समज करून घेण्याचे महाराष्ट्राने अनुभवलं आहे. त्याकडे बऱ्याचदा शासनानेही दुर्लक्ष केले आहे. जातीवाचक धर्माच्या नावाखाली ते वारंवार समाजात फूट पाडून दुही निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी तर भिडे यांनी आपली बुध्दी, वय व आपली आता पर्यंतची सर्व जगण्याची वागण्याची मर्यादा गहाण ठेवून अत्यंत बेजबाबदार वक्तव्ये करुन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल बालीश बोलून महाराजांच्या प्रतिमेला तडा देण्याचे कुटिल कारस्थान केले आहे. भिडे यांनी नविन जावई शोध लावला आहे की शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. याला अज्ञान म्हणावं की म्हातारचळ हे समजायला मार्ग नाही. महाराष्ट्र हा निधर्मी सुसंस्कृत असून हे राष्ट्र पुढं नेण्यासाठी अनेक शूरवीर संत महापुरुष विचारवंत यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात रयत सुखी समाधानी होती त्यांनी न्याय, समता गोर गरीब जनतेला आधार, संरक्षण दिले होते. राजांच्या पाटलाने एका गरीब कुटुंबातल्या मुलीवर अत्याचार केला होता. तो त्या गावचा पाटील होता न्यायी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या पाटलाच्या मुसक्या बांधून राजवाड्यात आणायला सांगितले. जेव्हा तो पाटील मग्रुरी ने महाराजांसमोर आम्ही पाटील आहोत असं मोठ्या आविर्भावात बोलला तेव्हा महाराजांनी त्या पाटलांचे दोन हात छाटून टाकण्याचा आदेश दिला याला म्हणतात न्याय. दुसरं असं की महाराजांच्या राज्यात सर्व धर्म जातीतील लोकांना त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन जबाबदारी दिली होती त्यामुळे प्रत्येकाला वाटत होते हे राज्य माझं आहे. महाराजांनी सैन्यातील जबाबदार सरदार सैनिक यांना सुचना दिल्या होत्या रयतेच्या शेतातील कुणाच्या देठाला सुध्दा हात लाऊ नका. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात कोण होते हे इतिहासातील पानं चाळून पहा.  जगात सर्वश्रेष्ठ कारभार राजवट जर कोणाचीही असेल तर ती युगप्रवर्तक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव अग्रभागी आहे. बहिर्जी नाईक येसाजी कंक, रायपा महार, मदारी मेहतर  अशी अनेक नावे सांगता येतील ही माणसं कोणत्या जातीची धर्माची होती. संभाजी भिडे हे बुध्दी भेद करून महाराजांची बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या त्या बोलण्याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराजांच्या प्रतिमेला तडा पोहचवण्याचा भिडेंचा उद्देश व त्यांच्या हेतू विषयी शंका आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या