✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/7/2026 :
जर आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टिका सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते तर टिका व्यक्तीला सतत जागृत ठेवते. सतत होणाऱ्या टिकेमुळे आपलं मन हळूहळू खंबीर होत जातं. मन खंबीर होणं हे एका दिवसात होत नाही. तो रोजचा प्रवास असतो.
स्वतःला दोष देणे थांबवणे, स्वतःशी प्रामाणिक राहणे, आणि प्रत्येक पडझडीनंतर मदतीसाठी स्वतःलाच हात देणे हे सगळं हळूहळू घडत जाते. मग एक दिवस आपल्यालाच जाणवतं की परिस्थिती जैसे थे आहे, पण आपण मात्र बदललो आहोत. हाच बदल आपल्या आयुष्याला नवी व वेगळी दिशा देतो.
कौतुक अनेक वेळा लांबच्या लोकांकडूनच होते, जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो.
कितीही चांगली व्यक्ती असली तरी कोणी ना कोणी तरी नाव ठेवणारच. म्हणून प्रत्येकाने आपलं जीवन आपल्या आपल्या पद्धतीने जगावे.
आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, कांहीच न बोलता आठवणी निघूनही जातात पण तरीही आयुष्यात फक्त आठवणीच शिल्लक राहतात.
मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली, तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटे इतकीच असते. म्हणूनच माणसाने ही आपल्या मळकेपणावर कमीपणा घेऊ नये.
व्यक्तीमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य.
विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो. किती होतो, कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून असते.
रस्त्यावर पडलेल्या चाफ्याला चुकून तुडवलं तर, त्या वेड्यांने पावलांना सुद्धा सुगंधात बुडवलं.
ज्याने आयुष्यात आपली वाईट वेळ पाहिलेली आहे, तो कधीच दुसऱ्याचं वाईट व्हावं हा विचार सुद्धा करणार नाही. माणसाला सर्वांत क्रूर करतो तो त्याचा स्वार्थ.
ओवता आले पाहिजे, विणता आपोआप येते, मग तो धागा असो वा नाते.
तुमचे शब्द, विचार आणि कृती एकच असेल तर त्यावर तुमची ईमानदारी ठरते.
प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
प्रविण सरवदे, कराड,
=============

0 टिप्पण्या