🔰 कर्ण 🔰
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/03/2026 :
कर्ण हा कुंतीभोज राजाची मुलगी कुंती आणि सूर्य यांचा पुत्र आहे हे सर्वांनाच माहित आहे. कुंतीच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एक वरदान दिले की ती ज्या देवाचे स्मरण करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होईल. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्यदेवाचे स्मरण करत मंत्रोच्चार केला आणि तिला पुत्रप्राप्ती झाली. कर्णाचा जन्म झाला. त्याला जन्मतः च अंगावर कवच आणि कानात सोन्याची कुंडले होती.
कर्ण अतिशय दानशूर आणि चारित्र्यवान होता. तो प्रजेसाठी सतत जागरूक असे. त्याच्याकडे जो कोणी मदत मागायला येत असे, त्याला कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवले नाही. अगदी रूप बदलून आलेल्या इंद्रदेवाला सुध्दा त्याने दान म्हणून आपली कवचकुंडले देऊन टाकली. जेव्हा महाभारताचे युद्ध घडले, त्या युध्दात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावले. रुक्मिणीलाही हाच प्रश्न पडला होता की श्रीकृष्णाने असे का करायला लावले.
महाभारताचे युद्ध संपले आणि कृष्ण जेव्हा घरी परतला तेव्हा रुक्मिणीने त्याला विचारले, कर्ण सर्व बाबतीत निर्दोष असताना तुम्ही त्याला अर्जुनाला मारायला का सांगितले? यावर कृष्ण म्हणतो, कर्ण अतिशय विद्वान, चारित्र्यवान आणि दानशूर होता. त्याने याचकाला कधीही वापस विन्मुख पाठवले नाही. परंतु जेव्हा अभिमन्यूने कौरवांनी रचलेले चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला तेव्हा त्याने सर्वांना पराभूत केले होते, पण त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र सापडत नव्हता. याचाच फायदा कौरवांनी घेतला आणि अभिमन्यूला मारले. तेव्हा जवळच उभ्या असलेल्या कर्णाला अभिमन्यूने पाणी मागितले. कर्ण जिथे उभा होता त्याच्या पाठीमागे एक खड्डा होता ज्यात स्वच्छ पाणी होते. परंतु जर अभिमन्यूला पाणी दिले तर माझा परम मित्र दुर्योधनाला वाईट वाटेल असा विचार करून कर्णाने पाणी दिले नाही. तहानेने व्याकुळ होऊन अभिमन्यूने तडफडत प्राण सोडला. अशाप्रकारे कर्णाच्या एका चुकीमुळे त्याने जीवनभर केलेल्या चांगल्या कृतींवर आपोआपच पाणी फेरल्या गेले. युध्द जेव्हा झाले तेव्हा कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्यात फसले जेथे पाणी होते जे कर्णाने पाण्यासाठी तडफडणा-या अभिमन्यूला पाजले नाही. रथाचे चाक तिथेच अडकणे म्हणजे कर्म परत येणे आहे. कर्णाच्या एका वाईट कर्मामुळे त्याने केलेल्या सर्व चांगल्या कर्मांचा नाश झाला म्हणून त्याला ठार करावे लागले.
तात्पर्य : एक वाईट काम सर्व चांगल्या कामांवर पाणी फिरवतं. म्हणूनच कधी कुणाचं वाईट चिंतू नये. मग तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळणार.
डॉ. लैलेशा भुरे
नागपूर
संकलन : सरवदे प्रविण कृषी अधिकारी
======================
0 टिप्पण्या