(प्राथिनिधीक फोटो)
💢 शेतकऱ्यांचे पैसे थकवले, सोलापूर विभागातील 11 साखर कारखान्यांवर कारवाई
🟣 सोलापूर जिल्हा आघाडीवर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/10/ 2024 : ऊस उत्पादकांच्या गाळप केलेल्या थकित ऊस बिलाच्या संदर्भात कारखान्यांना नोटीसा काढून व सुनावणी होऊनही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविण्यात राज्यात केवळ सोलापूर विभागातील 11 साखर कारखान्यावर आर आर सी अन्वये साखर आयुक्तांनी कारवाई केली आहे. आजही ऊस उत्पादकांचे पैसे थकविण्यात राज्यात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानेच आघाडीवर आहेत. मागील ऊस गाळप हंगामात राज्यातील 208 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. काही जिल्ह्यातील काही मोजके साखर कारखाने दरवर्षीच शेतकऱ्यांना उसाचे पैसे लवकर देत नाहीत. साखर आयुक्तांच्या नोटीस व सुनावणीलाही जुमानत नाहीत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचा दरवर्षीच समावेश असतो. मागच्या सरलेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्यातील सात, धाराशिव च्या तीन तर अहमदनगर जिल्ह्यातील एक साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याने साखर आयुक्तांनी आर आर सी अन्वये कारवाई केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांने शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दरवर्षीच उशिराने देतात मात्र काही कारखान्यांनी शंभर टक्क्याहून अधिक पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आर आर सी कारवाई झालेल्या दहा साखर कारखान्याकडे 179 कोटी 55 लाख रुपये थकबाकी होती. साखर आयुक्तांच्या कारवाईनंतर आठ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले असून सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर कडे 341 लाख ,आदीनाथ सह. कारखान्याकडे 64 लाख तर अहमदनगर जिल्ह्यातील कर्मयोगी कारखान्याकडे 992 लाख अशी टक्के कोटी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे अडकले आहेत. याशिवाय शंभर टक्के ऊस उत्पादकांचे पैसे दिल्याचे साखर आयुक्ताकडे दिसत असले तरी काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. जाहीर केल्याप्रमाणे प्रति टनाला 2600 रुपयाने पैसे दिले मात्र एफआरपी नुसार (प्रति टन 2000 व त्यापेक्षा अधिक काही रुपयाने) हिशोब सादर केल्याने शंभर टक्क्याहून अधिक पैसे शेतकऱ्यांना दिल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात अनेक शेतकरी पैशासाठी कारखाना व नेते मंडळींच्या कार्यालयाला चकरा मारत आहेत.
🟣या कारखान्यांवर झाली कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव या कारखान्यावर सरलेल्या हंगामात दोन वेळा तर मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट, विठ्ठल रिफाइंड शुगर पांडे करमाळा, आदिनाथ साखर कारखाना करमाळा, जय हिंद शुगर व दि सासवड माळी माळीनगर, धाराशिव जिल्ह्यातील लोकमंगल, माऊली गोकुळ शुगर व भीमाशंकर बार्शी, अहमदनगर जिल्ह्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप, श्रीगोंदा या साखर कारखान्यावर आर आर सी अन्वये कारवाई झाली आहे.

0 टिप्पण्या